Saturday, January 12, 2013

भारतीय जैवविविधतेचे 'होप'फुल छायाचित्रण

Friday, August 12, 2011

( Article was written for the publicity of HOPE Exhibition 2011, published in ''Thane Vaibhav'' Newspaper. )


शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे माहित नसतात. मग आपण त्यांना त्यांची नावे विचारतो, त्यांच्याशी ओळख करून घेतो. जसजसे दिवस जातात तसा त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडी-निवडी या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. आपल्यात आणि त्या मुलांमध्ये मैत्री निर्माण होते. हीच गोष्ट निसर्ग आणि माणसाच्या बाबतीत देखिल लागू होते. आपण निसर्गातील विवीध घटकांची, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, किटक, फुले, झाडे यांची नावे, त्यांची माहिती का बरं जाणुन घेतली पाहिजे? कारण यामुळे आपल्यात आणि त्यांच्यात एक नातं निर्माण होण्यास, हल्लीच्या भाषेत सांगायच तर एक 'बाँड' तयार होण्यास मदत होते. ह्ळुहळु या विषायात गोडी वाढू लागल्यावर निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू लागतो. निसर्गातील विविध घटकांबद्दल आपुलकी निर्माण होते. आपल्याला आपल्या पर्यावरणातल्या विविध समस्यांची जाणीव होते आणि मग पर्यावरण विषयक उपक्रमांमधे आपला सहभाग वाढतो!

  पर्यावरण विषयक जनजागृतीचा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ठाण्यात 'होप' ही संस्था गेली दहा हून अधिक वर्षे कार्यरत आहे. मागील वर्ष हे संयुक्त राष्ट्र संघटनेनी 'आंतरराष्ट्रीय जैवविविधतेच वर्ष' म्हणून जाहीर केले होते. तर यंदाचे वर्ष हे 'आंतरराष्ट्रिय वन वर्ष ' म्हणून जाहीर झाले आहे. यानिमित्ताने 'होप'  संस्थेने निसर्गछायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. 'भारतातील जैवविविधता' या संकल्पनेवर आधारित छायाचित्रे या वेळी प्रदर्शित केली जाणार आहेत.

  भारत हा जगभरातील जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणार्‍या पहिल्या दहा देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील 'पश्चिम घाट' आणि 'पूर्व हिमालयिन प्रदेश' हे जैवविविधतेसाठी नंदनवन मानले जातात. भारतात एकूण सतरा 'बायोस्फिअर रिझर्व' आहेत. बायोस्फिअर रिझर्व म्हणजे जिथे निसर्गातील इतर घटकांबरोबर माणसाचे अस्तित्व देखील मान्य आहे, जिथे माणसाला निसर्गाचाच एक भाग मानून दोघांची एकत्र राहाण्याची सोय केली आहे असा संरक्षित भूभाग. भारतात सुमारे ऐंशी 'राष्ट्रीय उद्याने' तर चारशे चौवेचाळीस अभयारण्ये आहेत.

 निसर्ग छायाचित्रणाकडे अलिकडच्या काळात एक 'सिरिअस हॉबी' म्हणून पाहिले जाते. हा छंद जोपासणं खर्चिक असलं तरी दिवसेंदिवस यामध्ये येणार्‍या लोकांची संख्या वाढतेच आहे. धकाधकीच्या शहरी 'लाइफस्टाईल'  मधून चार निवांत क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी आणि निसर्गातील रंगीबेरंगी जीवांचे छायाचित्रण करण्यासाठी अनेकजण 'वीकेंड' ला जंगलाची वाट धरताना दिसतात. या प्रदर्शनात भारताच्या विविध प्रदेशात छायाचित्रित केलेले वन्यप्राणी, पक्षी, किटक, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, विविध प्रकारची फुले आणि वनस्पती पाहायला मिळतील.

  जंगालांवर अतिक्रमण, आणि त्यामुळे जैवविविधातेवर होणार परिणाम, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक सारख़्या काही जाती ह्या बद्दल आपण सगळीकडे वाचत असतो, चर्चा करत असतो. पण आज त्या दिशेने काही ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. नागरिकांनी अधिक जागरूक होऊन प्रशासन राबवत असलेल्या उपक्रमांना सह्कार्य दयायला हवे.

  'होप' सारख्या संस्थेच्या माध्यमातून निसर्गाबद्द्ल जनजागृती, आपुलकी निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. तेव्हा भारतातील जैव विविधतेचे माहितीपूर्ण दर्शन घडवणा-या या छायाचित्र प्रदर्शनाला जरूर भेट द्या. सहयोग मंदीर, घंटाळी, ठाणे पश्चिम येथे १३ आणि १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

-रसिका जोशी


Photo by: Kedar Bhat

Photo by: Yuwaraj Gurjar

Photo by: Rohan Lovalekar

Photo by: Abhijit Avalaskar

Photo by: Amol Patwardhan

Photo by: Rasika Joshi

Photo by: Vedawati Padwal